Advertisements
Advertisements
Questions
लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक स्पष्ट करा.
लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे मानवी घटक उदाहरणांसह लिहा.
Advertisements
Solution 1
- कृषी: खत व जलसिंचन यांचा वापर केल्याने शेतीच्या उत्पादनात वाढ होते. त्यावर अधिक लोकसंख्या पोसली जाऊ शकते. शेतीचे प्रकार, पीक पद्धत, लागवडीची पद्धत आणि वैशिष्ट्यपूर्ण पीक पद्धत या शेतीतील वैशिष्ट्यांमुळे लोकसंख्या वितरणावर परिणाम होत असतो.
- खनन: चांगल्या प्रतीच्या खनिजांची उपलब्धता असलेल्या क्षेत्रामध्ये उद्घोग केंद्रित होतात. खाणकाम आणि उद्घोग या व्यवसायामुळे या प्रदेशात रोजगार निर्मिती होते. अशा उद्योगांना लागणाऱ्या कुशल- अकुशल कामगारांच्या वस्त्या अशा परिसरात वाढतात, असे प्रदेश दाट लोकसंख्येचे बनतात. झांबियातील कटंगा तांबे खनिज पट्टा तसेच भारतातील छोटा नागपूर पठारी प्रदेश, याशिवाय पश्चिम युरोप, चीनमधील मांच्युरिया प्रांत, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील अपेलेशियन पर्वतीय प्रदेशातील लोह व दगडी कोळशाचा प्रदेश इत्यादी. खनिजांमुळे हे प्रदेश दाट लोकवस्तीचे बनले आहेत. काही खनिजांचे मूल्य एवढे जास्त असते की, विषम नैसर्गिक परिस्थिती असताना देखील अशा प्रदेशांत खनिजांचे उत्पादन घेतले जाते. अशा भागात लोकवस्ती दाट आढळते. असे प्रामुख्याने मौल्यवान व दुर्मीळ खनिजांच्या बाबतीत घडते. जसे सोने, खनिज तेल-वायू इत्यादी. उदा., ऑस्ट्रेलियातील वाळवंटी प्रदेशातील सोन्याच्या खाणीचा प्रदेश, नैर्ऋत्य आशियातील वाळवंटात असलेले खनिज तेल उत्पादक देश.
- वाहतूक: रस्ते किंवा महामार्गामुळे एखाद्या क्षेत्रामध्ये लोकसंख्या वाढते. वाहतूक आणि महामार्गांमुळेही अशा प्रदेशांमध्ये जाण्या-येण्यास सुलभता असते, त्यामुळे लोकसंख्येची घनता वाढते. याउलट जर जाण्या-येण्यास कष्ट, वेळ व पैसा अधिक लागत असेल तर अशा प्रदेशांत लोकसंख्येची घनता कमी असते. सागरी वाहतुकीमुळे नवनवीन भूमींचा शोध लागला. बंदरांचा विकास होऊन व्यापारास चालना मिळाली. तिथे लोकसंख्या वाढली. सुवेझ कालव्याच्या बांधकामामुळे कच्च्या मालाची आणि उत्पादित वस्तूंची देवाण-घेवाण किफायतशीर झाली. सागरी वाहतुकीमुळे किनारी प्रदेशांत लोकसंख्या एकवटलेली दिसते. भारताचे पूर्व आणि पश्चिमी किनारी प्रदेश तसेच अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा पूर्व आणि पश्चिम किनारी प्रदेश ही याची उदाहरणे आहेत.
- शहरीकरण: उद्घोगधंद्यांच्या विकासामुळे छोटी मोठी शहरे विकसित होतात. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी वाहतूक, व्यापार व इतर सेवा देणाऱ्या तृतीयक व्यवसायांमध्ये वाढ होते. नगरांमध्ये असणाऱ्या रोजगाराच्या संधी, चांगली वाहतूक व्यवस्था, शिक्षण व आरोग्याच्या दर्जेदार सोयी यांमुळे जगातील अनेक प्रदेशांत नागरी वस्त्यांचे सलग पट्टे आढळतात. उदा. बृहन्मुंबई.
- राजकीय घटक आणि सरकारी धोरणे: वरील सर्व घटकांशिवाय शासनाच्या विविध धोरणांचा परिणाम लोकसंख्येचे वितरण व घनतेवर होतो. शासनाच्या धोरणामुळे एखाद्या प्रदेशात लोकसंख्यचे केंद्रीकरण किंवा विकेंद्रीकरण होऊ शकते. उदा. सैबेरिया या अतिविषम हवामानाच्या प्रदेशात स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांना शासनाने विशेष भत्ते व इतर जीवनावश्यक सुविधा देऊ केल्याने रशियाच्या या भागात आता लोकसंख्येचे स्थलांतर होताना दिसते. जपानच्या लोकसंख्येपैकी एक तृतीयांश लोक त्या देशातील टोकिओ शहरात राहतात. त्यामुळे तेथील सरकार लोकांना टोकिओ सोडण्यासाठी प्रोत्साहन स्वरूप पैसे देऊ करत आहे.
Solution 2
लोकसंख्येच्या वितरणावर प्राकृतिक घटकांचा मोठा परिणाम होतो. जिथे निसर्ग साथ देतो, तिथे वस्ती दाट असते आणि जिथे परिस्थिती कठीण असते, तिथे लोकसंख्या विरळ आढळते. तरीही, अनेकदा मानवाने निर्माण केलेले सांस्कृतिक आणि सामाजिक घटक इतके प्रभावी ठरतात की, प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती असूनही केवळ मानवनिर्मित सुविधांमुळे त्या प्रदेशात लोकसंख्या अधिक वाढलेली दिसते.
(अ) आर्थिक घटक:
- औद्योगिक विकास: जिथे रोजगाराच्या संधी सहज मिळतात, अशा ठिकाणी लोक स्थायिक होण्यास प्राधान्य देतात. शासकीय विभाग, खासगी संस्था, कारखाने, खाणकाम, वाहतूक आणि शिक्षण यांसारख्या विविध क्षेत्रांत नोकरी मिळण्याची दाट शक्यता असल्याने लोक शहरांकडे आकर्षित होतात. शहरांमधील वाढता व्यापार आणि औद्योगिक उलाढालीमुळे तिथे मानवी वस्ती केंद्रित होते. मुंबई, दिल्ली, लंडन, शांघाय आणि टोक्यो यांसारख्या महानगरांमध्ये लोकसंख्येची घनता अतिशय जास्त असण्याचे हेच मुख्य कारण आहे.
- वाहतूक व दळणवळणाच्या सोयी: शहरे, बंदरे आणि रेल्वे जंक्शन्सच्या ठिकाणी वाहतूक व दळणवळणाच्या उत्तम सुविधांमुळे मालाची आणि प्रवाशांची मोठी ये-जा सुरू असते, ज्यामुळे व्यापाराला गती मिळते. प्रमुख बंदरांचा विस्तार होऊन ती आयात-निर्यातीची महत्त्वाची केंद्रे बनतात, जसे की मुंबई आणि कोलकाता. अशा बंदरांच्या परिसरात रस्ते वाहतुकीचे जाळे विस्तारल्याने अनेक उपनगरे विकसित होतात आणि पर्यायाने शहराच्या लोकसंख्येत सातत्याने वाढ होत राहते.
१९ व्या शतकानंतर जगभरातील वाहतूक आणि संदेशवहनाच्या सोयींमध्ये झालेल्या सुधारणांचा लोकसंख्येच्या वितरणावर मोठा परिणाम झाला आहे. सुएझ आणि पनामा यांसारख्या कालव्यांच्या निर्मितीमुळे तसेच विविध देशांतील महामार्गांच्या विस्तारामुळे वाहतुकीचे नवे मार्ग खुले झाले, ज्याचा प्रभाव लोकवस्तीवर पडला. या जलमार्गांच्या आणि नद्यांच्या खोऱ्यांत लोकसंख्या मोठ्या प्रमाणात एकवटलेली दिसते. परिणामी, जगातील सर्वाधिक दाट वस्ती असलेले प्रदेश हे प्रामुख्याने किनारपट्टीचे भाग, मोठी बंदरे आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महामार्गालगतचे क्षेत्र आहेत. - व्यापारी शेती: सुपीक जमीन, अनुकूल हवामान आणि सिंचन सुविधा असलेल्या क्षेत्रांत शहरांच्या गरजा भागवण्यासाठी किंवा निर्यातीसाठी शेतीचा विकास होतो. अशा सुविधेमुळे त्या भागात लोकसंख्येची घनता वाढते. उदाहरणार्थ, शहरांच्या लगतच्या भागांत होणारी ‘ट्रक फार्मिंग’ किंवा मंडई बागायती क्षेत्रे अशा दाट वस्तीसाठी ओळखली जातात.
- खाणकाम व्यवसाय: ज्या भागात खनिज संपत्तीचे साठे मोठ्या प्रमाणावर असतात, अशा प्रदेशात लोकसंख्येचे केंद्रीकरण झालेले दिसते. उदा., भारतातील दख्खनचे पठार, ऑस्ट्रेलियातील सोन्याच्या खाणींचा प्रदेश, मध्य-पूर्वेतील खनिज तेलसंपन्न देश.
- नागरीकरण: शहरांमध्ये कायमस्वरूपी स्थायिक होण्याकडे लोकांचा कल वाढत चालल्याने नागरी लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. रोजगाराची सुलभता, कामाच्या ठिकाणच्या सोयीसुविधा, निवासासाठी उत्तम घरे, तसेच शिक्षण, वाहतूक, व्यापार आणि करमणुकीची साधने उपलब्ध असल्यामुळे ग्रामीण भागातील लोक मोठ्या संख्येने शहरांकडे वळत आहेत. याच कारणामुळे लंडन, टोक्यो, साओ पावलो, बीजिंग, मुंबई आणि कोलकाता यांसारख्या महानगरांमध्ये लोकवस्ती अत्यंत दाट झाली आहे.
(ब) सामाजिक घटक: जगातील विविध देशांमध्ये वैविध्यपूर्ण सामाजिक प्रथा अस्तित्वात आहेत. भारतात आजही ग्रामीण भागांत बालविवाह आणि कमी वयात लग्न करण्याची पद्धत दिसून येते, तर आफ्रिकेतील काही समाजांमध्ये बहुपती आणि बहुपत्नीत्वाची प्रथा प्रचलित आहे. अशा सामाजिक रूढी-परंपरांचा त्या त्या प्रदेशातील लोकसंख्या वाढीच्या वेगावर थेट परिणाम होतो.
(क) राजकीय आणि ऐतिहासिक घटक: कोणत्याही राष्ट्रात जेव्हा मोठी राजकीय क्रांती किंवा बदल घडतो, तेव्हा लोक मोठ्या संख्येने स्थलांतर करतात. भारताच्या फाळणीमुळे पाकिस्तानमधून लाखो निर्वासितांचे भारतात आगमन झाले. त्याचप्रमाणे, बांगलादेशच्या निर्मितीच्या काळातही तिथून मोठ्या प्रमाणात निर्वासित भारतात आले. या लोकांच्या पुनर्वसनासाठी भारतात नवीन शहरे वसविली गेली. एखाद्या क्षेत्रातील राजकीय अस्थिरता देखील तिथली लोकसंख्या घटण्यास कारणीभूत ठरते. युद्धाची भीती टाळण्यासाठी लोक तणावग्रस्त भागातून बाहेर पडतात. उदाहरणार्थ, सीरियातील युद्ध आणि अस्थिरतेमुळे तिथल्या लोकसंख्येवर अत्यंत वाईट परिणाम झाला आहे.
