भाषा गोड आणि रसाळ वाटण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे तिच्यातील ध्वनिमाधुर्य. नामे आणि क्रियापदांना लागणारे काही प्रत्यय याचे उत्तम उदाहरण आहेत. जसे – गावाले, त्याइच्या, त्याइने, त्याइले इत्यादी प्रत्यय. या शब्दांचा उच्चार अतिशय मृदू आणि मुलायम आहे. अशा प्रत्ययांचे प्रमाण अधिक असल्यामुळे भाषा वाचताना किंवा ऐकताना मनही कोमल आणि प्रसन्न होते.
उदाहरणार्थ, प्रमाण मराठीतील ‘वाडा’ हा शब्द वैदर्भी बोलीत ‘वाळा’ असा होतो. तसेच ‘पडल्याने’ या शब्दाचे रूप ‘पळल्याने’ असे आढळते. या धर्तीवर अनेक उदाहरणे देता येतील. यावरून असे दिसते की वैदर्भी भाषेचा स्वभावच मुळात कोमल आणि मृदू आहे.
वैदर्भी भाषेतून प्रमाण मराठीत येताना मात्र ही गोडी काही प्रमाणात कमी होते. प्रमाण भाषेत आखीव-रेखीवपणा अधिक असल्यामुळे ती अधिक औपचारिक आणि थोडी कोरडी वाटते.
