खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.
Solution
लॉकडाऊन संपल्यानंतरचा शाळेचा पहिला दिवस
कोरोनाने सर्वांचे जीवन बदलले. वर्ष २०१९ मध्ये चीनात आढळलेला हा कोरोनाव्हायरस २०२० मध्ये भारतात पोहचला. भारतासह इतर सर्व देशांमध्ये लॉकडाऊन झाला.
कोरोना संकटकाळात लॉकडाऊनमुळे बंद असलेली शाळा आज सुरू होणार होती. लॉकडाऊन नंतर जेव्हा मी पहिल्यांदा माझ्या शाळेत गेली तेव्हा सर्वात अगोदर आमचे संरक्षण करून घेतले. शाळेत जाताना तोंडावर मास्क लावणे बंधनकारक असल्यामुळे काहीजण ओळखूसुद्धा येत नव्हते. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावरचे आमचे स्वागत मोठ्या आगळयावेगळया पद्धतीने केले गेले. एकमेकांपासून दोन फुटांच्या अंतरावर आम्हांला उभे केले होते. हाताला 'सॅनिटायझर' लावून पुढे एक शिपाई काका आमच्या शरीराचे तापमान आपल्या रजिस्टरमध्ये लिहून घेत होते. स्वच्छतेविषयी घोषणा आणि सूचनाफलक जागोजागी लावले होते.
आम्हांला पाहून मनोमन खुललेली. शाळेची इमारत अगदी वेगळी भासत होती. जणू आम्हां विद्यार्थ्यांची वाट पाहून थकलेली; रोज ऑनलाईन भेटणारी शिक्षकमंडळी आज प्रत्यक्ष पाहिल्यानंतर मात्र मनाला खऱ्या अर्थाने समाधान वाटले. शिक्षकांच्या नजरेतही समोर आपले विद्यार्थी दिसल्यानंतर दाटणाऱ्या भावना स्पष्ट दिसत होत्या. खूप दिवसांनी भेटणारे मित्र, मैत्रिणी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा उत्साह पाहून, सारेच शाळा सुरू होण्याची किती आतुरतेने वाट पाहत होते याची प्रचीती आली.
कोरोना महामारीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या जगभरातील नागरिकांना श्रद्धांजली प्रार्थनेच्या वेळी वाहण्यात आली. तसेच, सफाई कामगार, आशा वर्कर्स, पोलीस आणि आरोग्य कर्मचारी या कोव्हिड योद्ध्यांना टाळयांच्या गजरात सलाम केला गेला. शाळेत वावरताना काय काळजी घ्यावी हे पुन्हा एकदा सांगितले गेले.
मी पहिल्या दिवशी दुसऱ्या वर्गात जाऊन बसली. त्यामुळे मोठी गंमत झाली. झालं असं की, माझ्या एका मैत्रिणीने मला चुकीची माहिती दिली त्या कारणाने मी चुकीच्या वर्गात जाऊन बसले. वर्गातील बसण्याची पद्धत पूर्णपणे बदललेली होती. दरवाजाजवळ 'सॅनिटायझर' स्टँड होता. एका बाकावर एक अशा पद्धतीने बसण्याची व्यवस्था केली होती. वर्षभर ऑनलाईनचा अनुभव घेतल्यानंतर आज पुन्हा एकदा आमचा प्रत्यक्ष अभ्यास सुरू झाला. प्रत्यक्ष शिकण्याचा हा अनुभव वर्षभराने पुन्हा एकदा घेता येणार या विचारांनी मनात हुरहूर निर्माण केली होती. पुन्हा एकदा शिक्षकांनी सांगितलेल्या गमतीजमती, शिकवता शिकवता मध्येच विचारलेले सामान्यज्ञानाचे प्रश्न, मध्येच बडबडल्याने शिक्षकांचा मिळणारा ओरडा या सार्याला आसुसलेल्या आम्हां विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. या सगळया अनुभवांसह पहिला तास पार पडला आणि एक विलक्षण समाधान पदरी पडले.
पण खुपच महिन्याने माझ्या मैत्रिणींना व शिक्षकांना पाहून खूप आनंद झाला. घरामध्ये बसून मोबाइल, टिव्ही आणि संगणक यांत अडकलेल्या आम्हांला अखेर एकदाचे मित्र-मैत्रिणी भेटले आणि मधल्या सुट्टीत गप्पांना अक्षरश: ऊत आला होता. काय सांगू आणि किती सांगू असे झाले होते. मोबाइलच्या माध्यमातून सारे भेटत होतोच; पण प्रत्यक्षात झालेली भेट ही आपल्या आयुष्यात आपले मित्र-मैत्रिणी किती आवश्यक आहेत याची जाणीव करून देणारी होती. कधी एकदा खेळाच्या मैदानावर जातोय आणि धमाल करतो, असे प्रत्येकाला झाले होते; मात्र काही दिवस खेळाचे तास होणार नाहीत, अशी सूचना येताच साऱ्यांचाच हिरमोड झाला. थोडी काळजी घेणे आवश्यक होतेच. शाळा तर सुरू झाली. आता सर्वच मौजमजा पुन्हा अनुभवता येतीलच असा विचार करून शाळा सुटल्यावर आम्ही खूप आनंदाने घरी आलो. आपली सुरक्षा आपल्या हातात आहे त्यामुळे आपण काळजी घेतली पाहिजे.