खालील मुद्द्यांच्या आधारे प्रसंगलेखन करा.
Solution
माझी जंगल सफर
सहामाही परीक्षा संपली आणि घरी आल्याबरोबर आईने आनंदाची बातमी दिली की आपल्याला मामाच्या गावी जायचे आहे. मामाच्या गावी गेलो असताना जंगलची सफर करण्याचा अनुभव आला. माझ्यासारख्या शहरात वाढलेल्या मुलासाठी हा अनुभव विलक्षण होता. पहाटेपहाटेच मी, माझे भाऊ आणि दोघे मामा असा हौशी गोतावळा गावाबाहेरील शिवारातून जंगलाच्या झाडीत शिरला. मामाने हातात काठी घेतली होती. झाडांमधून वाट काढत आमची सफर सुरू झाली. मानवी वस्तीपासून दूर एका वेगळया दुनियेची मला ओळख होत होती.
आम्ही शहरात वाढलेली भावंडं मात्र पायाखाली येणाऱ्या काटक्यांच्या आवाजानेही दचकत होतो. पण माझे मामा जंगलाशी चांगलेच परिचित असल्याने बिनधास्त वाट तुडवत होते. पक्ष्यांच्या वेगवेगळया शिट्ट्या ऐकताना गंमत येत होती; मात्र एक अनामिक भीती सतत जाणवत होती. जंगलातील आतल्या बाजूला झाडांच्या दाटीमुळे फारसा सूर्यप्रकाश पोहोचत नव्हता. आकाश गायब झाल्यासारखे वाटत होते.
कित्येक वर्षे जुने असलेले उंच वृक्ष. कधीही पाहिले नाही तेच जंगलाच्या जुनेपणाचा अंदाज देत होते. करवंदाच्या जाळया, त्यामध्ये पिकलेली करवंदे पाहून आमच्या तोंडाला पाणी सुटले. हात घालू पाहताच काट्यांनी आम्हांला बोचकारले. मामाने मात्र सराईतपणे एकही काटा न बोचता अलगद करवंदं काढून दिली. एवढा मधुर रानमेवा आम्ही कधी चाखलाच नव्हता. अचानक पुढ्यातून कोणीतरी टुणकन उडी मारली. मी आणि माझे भाऊ दचकलोच. पाहतो तर काय? आमच्या पुढ्यातून एक ससा उड्या मारत गवतामध्ये दिसेनासा झाला. पुढे मोठमोठी वारुळे पाहून मी मनातून चरकलो. मामाने ही वारुळे मुंग्यांची असल्याचे सांगितल्याने हायसे वाटले. ज्या वारुळांवर सापाच्या सरपटण्याच्या खुणा असतात त्याच्या आसपास जायचे नाही एवढे मात्र मामाने आवर्जून सांगितले. ही माहिती नव्यानेच आमच्यामध्ये रूजत होती. जंगलातील अनेकविध पक्षी, त्यांचे आवाज, रंग, त्यांच्या सवयी, त्यांची घरटी असा माहितीचा अमूल्य खजिनाच मामांनी आमच्यासमोर उघडला. त्यातून किती खजिना लुटू असा प्रश्न मनाला पडला होता.
जंगलातील तळयाच्या आजूबाजूला पाणी पिण्यासाठी अनेक प्राणी, पक्षी येत असल्याने त्यांना चाहूल लागू न देताच त्यांना पाहता येणे शक्य होते. काही अंतर चालत गेल्यावर मामाने आम्हांला सावध केले. आम्ही हळुवार पावलं टाकत झाडीतून तळयाचे निरीक्षण करू लागलो. हरणं, काळवीट, माकडं असे कित्येक प्राणी सावधगिरीने पाणी पित होते. पक्षीही पाणी पिऊन गाणी गात भुरऽकन उडत होते. हा सृष्टीचा सोहळा फार आनंददायी होता. अगदी डोळयांचे पारणे फिटवणारा! मनामध्ये नवे चैतन्य भरणारा!
खरे जीवन या निसर्गाच्या सान्निध्यात दडलेले आहे. माणसांप्रमाणेच या सृष्टीवर इतर प्राण्यांचाही अधिकार आहे. या साऱ्या जंगलप्रवासात माझ्या लक्षात आले, की आपली निसर्गसंपदा समृद्ध आहे. तो आपण मान्य केला, तर जगण्याची मजा आणखी वाढेल. निसर्गाच्या सहवासातील अप्रतिम आनंद काय असतो याचा अनुभव मी या जंगलसफारीत घेतला. जंगलात शिरताना घाबरलेला मी मात्र अलिबाबाची गुहा पाहून आल्याप्रमाणे मोठ्या आनंदात घरी परतलो. सर्वांचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यानंतर परतीचा प्रवास सुरू झाला. परतीच्या प्रवासात मी अनेक पक्ष्याचे मनसोक्त फोटो काढले.