खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा
Solution
जलसाक्षरता : काळाची गरज
पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे. पृथ्वीवरील पाणी हेच जीवन आहे असे म्हटले तरी ते चूक ठरणार नाही. पृथ्वीवर पाणी नसते, तर जीवसृष्टी निर्माणच झाली नसती. पाण्यामुळेच पृथ्वीवर सजीव आजवर टिकून आहेत. 'जल है तो कल है!' असे घोषवाक्य आपण अनेकदा ऐकतो. पाणी संपले, तर कदाचित संपूर्ण पृथ्वीवरचे जीवन नष्ट होईल. पृथ्वीवरील उपलब्ध पाण्यापैकी ०.९% पाणीच नद्या, सरोवरे, विहिरी, तलाव यांमध्ये उपलब्ध आहे. त्याचाच उपयोग आपल्याला करावा लागतो. लोकसंख्यावाढ, शहरीकरण, गरजांमधील वाढ या गोष्टी पाणीटंचाईला कारणीभूत ठरतात. एक दिवस असा येईल, की पाण्याची किंमत खनिज तेलापेक्षा जास्त असेल, येणारा भविष्यकाळ आपल्याला तिसरे महायुद्ध पाण्यासाठी दाखवेल अशी तज्ज्ञांची मते आपल्याला उद्याचे विदारक रूप दाखवतात.
पाण्याचे मूळ आणि ऋषीचे कूळ विचारू नये म्हणतात. पाणीरूपी अमृताचा अपव्यय टाळण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याची सवय प्रत्येकाने लावली पाहिजे. भारतात जलप्रदूषणाची मोठी समस्या आहे. औद्योगिकीकरणामुळे नद्या-नाले प्रदूषित केल्या जातात. मोठे मोठे कारखाने पाण्याचा वाटेल तसा वापर करून त्याची नासाडी करतात. घरात अथवा सार्वजनिक ठिकाणी पाण्याचे गळके नळ किंवा वापरानंतर तसेच, चालू ठेवलेले नळ हे पाण्याच्या अपव्ययाला कारणीभूत ठरतात. पाणवठ्यांवरील अस्वच्छताही पिण्यायोग्य पाण्याचे प्रदूषण करते. सणांमध्ये मूळ परंपरा बाजूला ठेवून उगाच पाण्याचा अपव्यय केला जातो. नद्यांमधून चालणारी जलवाहतूकही पाण्याची नासाडी करण्यास कारणीभूत ठरते. या सर्व कारणांमुळे आज पिण्यायोग्य पाण्याचे साठे अत्यंत मर्यादित झाले आहेत. अनेक शहरे, गावे पाणीटंचाईची भीषण समस्या अनुभवत आहेत. पाण्यासाठी मैलोन् मैलांची पायपीटही करावी लागत आहे. शेतीला पाणी नसल्याने ती ओसाड ठरत आहे. धरणांमधील पाणीसाठा आता अपुरा पडू लागला आहे. मनुष्य आणि इतर प्राणीही या पाणीटंचाईला बळी पडत आहेत.
उन्हाळ्याच्या दिवसात २ वेळा 'वॉश' घेणारेही अनेकजण असतात. त्यासाठी ५० ते १५० शुद्ध पाणी वापरले जाते. या संकटावर मात करण्यासाठी पाण्याचा योग्यप्रकारे वापर करणे व पाण्याचा अपव्यय टाळण्याचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. जलसंवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून ती वैश्विक जबाबदारी आहे. त्यामुळे, प्रत्येक व्यक्तीने पाणी वाचवण्यासाठी आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे. जलशुद्धीकरणाच्या नव्या तंत्राचा वापर, दूषित पाणी शुद्ध करून त्याचा पुनर्वापर, नव्या बांधकामांमध्ये परवानगी देताना पावसाळी पाण्याच्या साठवणीसाठी टाकी बांधण्याची अट अशा प्रकारच्या गोष्टींतून जलसंवर्धन शक्य आहे. छोट्या छोट्या नद्यांवर बंधारे बांधून पाणी अडवले, तर ते जमिनीत झिरपून पाण्याची पातळी वाढू शकेल. नद्यांचे पात्र पुन्हा खणणे, नद्या एकमेकींना जोडणे यांमुळेही पाण्याच्या समस्या कमी होतील.
खरे तर पाणी वाचविण्याची मानसिक तयारी जरूरी आहे, प्रबोधन जरूरी आहे. सांडपाण्याचाही पुनःवापर करता आला पाहिजे. पाऊस पडावा म्हणून झाडे लावून त्यांची काळजी घेतली, उघडे उजाड डोंगर हिरवेगार केले, तर निश्चितच पुरेसा पाऊस होईल. त्यामुळे, जलसाठे भरलेले राहतील. जमिनीखालील पाण्याच्या पातळीत वाढ होईल. प्रत्येकाने जलसाक्षर होऊन पाण्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे. नाहीतर माणसाकडे माणसाच्या डोळयांतल्या पाण्याशिवाय काही उरणार नाही.