खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा
Solution
सुसंवाद काळाची गरज
सर्वसामान्य माणसाला आपल्या घरात, कुटुंबात शांतता, तणावरहित वातावरण मिळालं तर तो आनंदी राहतो. माणसाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र व निवारा या आहेत; मात्र यांच्याबरोबरीने काही भावनिक गरजाही त्याला जगण्यास उपयुक्त ठरतात. माणसांच्या गर्दीतही माणूस कुठेतरी एकटा पडत आहे. हे एकटेपण सहन न झाल्याने विचित्र वागणारी माणसे आपल्या आजूबाजूला दिसतात. मुळातच माणूस हा समाजशील प्राणी आहे. त्याला आपल्या भावना व्यक्त करणे आणि दुसऱ्याच्या भावना समजून घेणे आवडते. याकरता महत्त्वाचा ठरतो तो संवाद. संवाद हा सुसंवाद असेल, तर माणसाचे माणूस म्हणून जगणे सुसह्य आणि आनंदी होऊन जाते.
ऐकणं हृदयापासून व्हायला हवं. बोलणाऱ्याशी ऐकणाऱ्यानं जोडलं जायला हवं. एकमेकांशी बोलणे म्हणजे सुसंवाद नव्हे. मनापासून साधलेला आणि मनापर्यंत पोहोचलेला संवाद म्हणजे सुसंवाद. आपल्या कुटुंबियांसोबत आपल्याला हा सुसंवाद साधणे आवश्यक असते. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण घड्याळाच्या काट्यावर धावत असतो. कुटुंबाला वेळ देता येत नाही. कामाचा व्याप, सततची धावपळ यांमध्ये माणूस अशाप्रकारे गुरफटून जातो, की घरात असूनही घरात काय चालू आहे याचे भान त्याला नसते. त्यात आपल्या वागण्यावर लक्ष ठेवून असणारी वडीलधारी मंडळी कुटुंबव्यवस्थेतून बाहेर पडल्यामुळे एकटेपणाचे ओझे आपल्यावर आल्यासारखे वाटते. आपल्यापेक्षा वेगळया मतांचा आदर राखून एखाद्या गोष्टीची चर्चा करणे म्हणजेच सुसंवाद साधणे ही कुटुंबाची गरज आहे.
सामान्यपणे मित्र-मैत्रिणींसोबत सुसंवाद साधणे सोपे जाते. आपल्याच वयाच्या, आपले विचार अधिक चांगल्याप्रकारे समजून घेणारे मित्र-मैत्रिणी असतील, तर आपले मन मोकळे करायला हक्काचे माणूस सापडते. आपल्या मनात भावभावनांची, विचारांची दाटलेली गर्दी दाबून ठेवली, तर त्याचे मनावर दुष्परिणाम होतात. त्यासाठी आपला कोणाशी तरी सुसंवाद होणे आवश्यक असते.
श्रुतप्रज्ञ स्वामी म्हणतात की, बोलणं किंवा न बोलणं यापेक्षा तुम्ही काय ऐकता, ते किती हृदयापासून ऐकता, त्यावर प्रतिसाद कसा आणि कोणत्या शब्दात देता हे महत्त्वाचं असतं. 'मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण.' हे मन आनंदी, स्थिर राहण्यासाठी सुसंवाद महत्त्वाची भूमिका बजावतो. एखादी खोली झाडून स्वच्छ करावी त्याप्रमाणे मनातले विचार बोलून दाखवल्यावर मनही स्वच्छ झाल्यासारखे वाटते. एकटेपणाची भीती, हृदयावरील ताण, तणाव या गोष्टी माणसाला आत्महत्येकडे जाण्यास प्रवृत्त करतात. अशा धोक्यांपासून दूर राहण्यासाठी सुसंवाद साधला जाणे महत्त्वाचे ठरते.
जीवन समृद्धीचे रहस्य म्हणजे सुसंवाद होय. 'शब्दावाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले' ही परिस्थिती शक्य नसली तरीही जे वाटते ते बोलता येत असेल, जे सांगू ते ऐकून घेणारी माणसे आपल्या आजूबाजूला असतील, तर जीवनाची गोडी अनुभवता येते. संवाद प्रेमाची अनुभूती देतात. या सुसंवादातून प्रेरणा मिळते, नाती जुळतात, आयुष्य स्थिर बनते. असा सुसंवाद साधला, की आपलं आयुष्यही अनमोल होतं.