खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही कृती सोडवा
Solution
कोरोना संकट
जगभरात सध्या कोरोनाचा कहर सुरू आहे. जगभरातील लाखो लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून 'लॉकडाऊन', 'कॉरंटाईन', 'कोव्हिड' या कधीही न ऐकलेल्या शब्दांचा प्रत्यक्ष अनुभव देणाऱ्या करोना महामारीने संपूर्ण जगभरात दहशत निर्माण केली. कोरोना विषाणूमुळे माणसाच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला. डिसेंबर २०१९ च्या दरम्यान चीनमध्ये या विषाणूचा प्रसार पहिल्यांदा लक्षात आला. पाहतापाहता जगभरातील विविध देशांत कोरोना झपाट्याने पसरला. भारतामध्ये कोरोना रुग्ण सापडण्याची सुरुवात जानेवारी २०२० मध्ये झाली आणि खबरदारीचा उपाय म्हणून मार्च २०२० मध्ये भारत सरकारने 'लॉकडाऊन' करण्याचा निर्णय घेतला.
कोरोनासंकट ही खरंतर एक इष्टापत्ती समजली जायला हवी. संपूर्ण मानवजातीला आव्हान देणाऱ्या या विषाणूमुळे संपूर्ण जगभरात करोडो लोक बाधित झाले. अनेक लोक मृत्युमुखी पडले. हॉस्पिटल कोरोना रुग्णांनी भरून गेली होती. विषाणूवर कोणतीही लस उपलब्ध नसल्यामुळे नेमकी काय उपचारपद्धती द्यावी याविषयी संभ्रमाचे वातावरण होते. शाळा, कॉलेज, व्यवसाय, रेल्वेसेवा सारेच ठप्प झाले. देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. कित्येक लोकांचे रोजगार गेले. जगणे असह्य झाले. हाताला काम नसलेले लोक शहर सोडून गावी गेले. या लोकांना गावी जाण्यासाठी कोणत्याही सेवा उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी अत्यंत हालअपेष्टा सहन करत प्रवास केला. लोकांच्या घरातील अन्नधान्याचा साठा संपल्यामुळे लोक हवालदिल झाले होते. घरातून बाहेर पडणे शक्य नसल्यामुळे आणि बाहेर भीतीयुक्त वातावरण असल्यामुळे लोकांमध्ये चिडचिड, नैराश्य आले होते.
ज्यातून आपल्या जागतिक समुदायाची परस्परावलंबित्वाची गरज, एखाद्या समस्येला धीराने तोंड देण्यासाठी लागणारे सामर्थ्य वाढीस लागले पाहिजे. हे संकट भयावह असले तरी त्याने मानवाला काही गोष्टी निश्चितच शिकवल्या. या काळात वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेकडे गांभीर्यपूर्वक पाहिले गेले. संपूर्ण विश्वात माणूस किती क्षुल्लक प्राणी आहे याची जाणीव कोरोना महामारीने करून दिली. नोकरी, व्यवसाय, पैसा यांत गुंतल्यामुळे आपण जगण्यातील साध्या, निखळ आनंदाला मुकत असल्याची जाणीव प्रत्येकालाच झाली. या अतिशय तणावपूर्ण काळातही कुटुंब एकत्र आले. गप्पा मारणे, एकत्र जेवणे, बैठे खेळ यांतून विरंगुळा साधला गेला. कामधंदा बंद असल्यामुळे चित्रकला, लेखन, गायन, वादन असे छंद पुन्हा जोपासले गेले. दिवसरात्र यंत्राप्रमाणे काम करणाऱ्या माणसाला स्वत:कडे बघण्यासाठी वेळ मिळाला. कुटुंबाला वेळ देता आला. अनेकांनी आपला गाव कित्येक वर्षांत पाहिला नव्हता. ते गावी जाऊन राहिले.
कोरोनाचा प्रादुर्भाव जगभर पसरवणाऱ्या चीनने सुरुवातीला कोरोना विषाणूसंदर्भात मूग गिळणेच पसंत केले. कोरोनाचे संकट हे जागतिक संकट आहे. जगातील जवळपास प्रत्येक देश या संकटाचा सामना करत आहे. एकूणच मानवजातीवर आलेल्या या संकटाने अमेरिकेसारखा बलाढ्य देशही हतबल झालेला दिसला. संशोधनाअंती कोरोना विषाणू प्रतिबंधक लस तयार केली गेली; मात्र अजूनही हे संकट पूर्णपणे टळलेले नाही. कोरोनाचे रुग्ण आजही सापडत आहेत. ज्याप्रमाणे औषध तयार केले गेले त्याप्रमाणे विषाणूसुद्धा आपले स्वरूप बदलत आहे, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. जगभरात अजूनही कोरोनाचे भय कायम असून यातून बाहेर पडण्याचा मार्ग प्रत्येक देश शोधताना दिसत आहे.