रसग्रहण.
खालील ओळींचे रसग्रहण करा.
विंचू चावला वृश्चिक चावला ।
कामक्रोध विंचू चावला ।
तम घाम अंगासी आला ।।धृ.।।
पंचप्राण व्याकुळ झाला ।
त्याने माझा प्राण चालिला ।
सर्वांगाचा दाह झाला ।।१।।
मनुष्य इंगळी अति दारुण ।
मज नांगा मारिला तिनें ।
सर्वांगी वेदना जाण ।
त्या इंगळीची ।।२।।
Solution
आशयसौंदर्य : संत एकनाथ महाराज यांनी 'विंचू चावला' या भारुडामध्ये दुर्गुणांवर कसा विजय मिळवावा व सत्संगाने काम-क्रोधरूपी विंचवाचा दाह कसा शमवावा, याची महत्त्वपूर्ण शिकवण दिली आहे. काम-क्रोधरूपी विंचू चावल्यामुळे झालेला दाह कमी करण्याचा नामी उपाय या भारतात नाट्यमयरीत्या संत एकनाथ महाराजांनी विशद केला आहे.
काव्यसौंदर्य : काम-क्रोधाचा विंचू जेव्हा दंश करतो, तेव्हा दुर्गुणांचा घाम अंगाला येतो. तामसवृत्ती उफाळून येते. त्यामुळे जीव व्याकूळ होऊन प्राणांतिक वेदना होतात. साऱ्या अंगाला दाह होतो; कारण मनुष्यरूपी इंगळी अतिभयंकर आहे. तिचा डंख तापदायक व वेदनेचे आगर असते. असा उपरोक्त ओळींचा भावार्थ नाट्यमय रीतीने लोककथेच्या बाजाने सार्थपणे व्यक्त होतो.
भाषिक वैशिष्ट्ये : लोकशिक्षण देणारे 'विंचू चावला' हे आध्यात्मिक रूपक आहे. या भारुडाची भाषा द्विरुक्तपूर्ण असल्यामुळे आशयाची घनता वाढली आहे. यातून सांसारिक माणसांना नीतीची शिकवण मिळते. षड्विकारांवर सद्गुणांनी मात करा, असा मोलाचा संदेश हे भारूड देते. 'विंचू, वृश्चिक व इंगळी' अशा चढत्या भाजणीचे शब्द विषाचा विखार दाखवतात. 'तमघाम, दाह, दारुण, वेदना अशा शब्दबंधामुळे डंखाची गती आवेगाने मनात होते. ही भारूड रचना विलक्षण नाट्यमय आणि मनाचा ठाव घेणारी ठरली आहे.