दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटींतील घटकांचे आत्मकथन लिहा
Solution
'मी एस.टी बोलतेय...'
सह्याद्रीच्या कड्याकपारीत तुमच्या सेवेत भेधडक पणे फिरनारी तुमची सर्वांची लाडकी एस.टी बोलतेय. संपला एकदाचा लॉकडाऊन. या डेपोमध्ये उभं राहून अगदी कंटाळा आला होता. चला, मी निघाले माझ्या कामावर. मी कोण म्हणून काय विचारता? मी तुमची सर्वसामान्यांची लाडकी एस.टी बोलतेय. काही जण प्रेमाने मला 'लालपरी' म्हणतात, तर काहीजण 'लालडब्बा' म्हणून चिडवतात; पण तरीही 'वाट पाहीन; पण एस.टी नेच जाईन' असे म्हणत माझीच वाट पाहतात.
साऱ्यांनीच अनुभवलेला लॉकडाऊनचा काळ म्हणजे जणू तुरुंगवासाची शिक्षाच. बाहेरचे जग बघण्याची, फिरण्याची, गावोगावी जाण्याची आवड असलेल्या आम्हांला एकाच जागी उभे राहण्याची वेळ आली. तसे आम्ही खूप संप, बंद, आंदोलने, दंगे पाहिले. तुम्ही फेकलेले दगड झेलले. तुम्ही लावलेल्या आगीत माझ्या बहिणी होरपळल्या; पण आम्ही थांबलो नाही, सलग इतके दिवस एकाच जागी उभे राहण्याची वेळ मात्र या कोरोना प्रादुर्भावामुळे केलेल्या 'लॉकडाऊन' ने आणली.
आम्ही बंद झालो आणि संपूर्ण दळणवळण सेवा ठप्प झाल्या. खेड्यापाड्यांतील गरीब आणि श्रीमंत सगळयांच्या हक्काची एस.टी बंद झाल्याने त्यांचे प्रवासाचे हाल झाले. शहराला आणि खेड्याला जोडणारा दुवा म्हणजे मी; पण लॉकडाऊनमध्ये हे सारेच ठप्प झाले. 'प्रवाशांच्या सेवेसाठी' हे ब्रीदवाक्य घेऊन आम्ही सातत्याने धावत असतो. उन्हातान्हातून, पावसापाण्यातून खेडोपाडी अखंडपणे सेवा देणे हेच आमचे काम. ज्या गावातून मी सुटते, त्या गावातील लोक मला 'आमची एस.टी' असं आपुलकीनं म्हणतात, तेव्हा धन्य धन्य वाटते. आपल्या माणसांची भेट घडता त्यांच्या चेहऱ्यावर उमलणारा आनंद मला अभिमानाने फुलवून सोडतो. लोकांना मी अगदी हक्काची वाटते. हे पाहून समाधान मिळते. लोकांच्या जीवनात आपले महत्त्व किती आहे हे जाणवते तेव्हा उगाच मिरवावंसही वाटतं. बर वाटतं मला जेव्हा माझी आतुरतेने वाट बघत प्रवाशी बस स्थानकांवर उभे असतात.
कमी वेळात सोयीचा प्रवास करता यावा म्हणून माझी निवड सगळेच करतात. विद्यार्थ्यांना मासिक पास, ज्येष्ठ नागरिकांना, दिव्यांगांना तिकीट दरात सवलत, प्रवाशांना सहलीसाठी सवलत अशा एक ना अनेक गोष्टींमुळे जनमाणसांत मी प्रचंड लोकप्रिय आहे. गौरीगणपतीच्या सणाला पार तळकोकणात जाणारे प्रवासी 'आपली लालपरी बरी' असे म्हणून प्रवास करतात तेव्हा खूप मजा येते. शहरे आणि अगदी विरळ वस्तीची खेडी एकमेकांना जोडण्याचे काम मी २४ तास अखंडपणे करत असते.
मानवाचा राग माझ्यावरच निघतो ओ. तुमचा क्षणिक निषेध व्यक्त करण्यासाठी माझ्यावरच दगडफेक केली जाते, माझीच तोडफोड केली जाते, माझीच जाळपोळ केली जाते… का? कशासाठी मी माझ्या कार्यात कधीच कमी पडत नाही.. तरीही तुमचा राग माझ्यावरच का निघतो? या सगळया आपुलकीच्या नात्यामध्ये प्रवाशांबद्दल माझी एक तक्रार आहे. तुम्ही मला आपली म्हणता आणि माझी काळजी घेत नाही, याचे मला वाईट वाटते. शेंगांची टरफले, वेफर्सची पाकिटे, पान खाऊन थुंकणारे आणि उगीचच आपली नावे टाकून माझ्या सीटचा मागचा भाग खराब करणारे यांची मला चीड येते. आम्ही तुमच्या सेवेसाठी आहोत आणि आयुष्यभर तुमच्या उपयोगी पडणार आहोत. मग आमची काळजी तुम्हीसुद्धा घ्यायला हवी, असे तुम्हाला वाटत नाही का?