अभिव्यक्ती
मामूच्या व्यक्तिमत्त्वातले तुम्हाला जाणवलेले गुण स्पष्ट करा.
Solution
मामू हा खूप भावनाशील होता. तो निवृत्त व्हायला आलेला होता. त्याला नातवंडे होती. या वयातही आई गेल्यावर त्याच्या डोळ्यांतून अश्रू आले. तो आईच्या आठवणींनी व्याकूळ झाला.
राजाराम महाराजांचा पन्हाळगडावर मुक्काम असताना मामूला तिथे जावे लागले. त्या काळात वाहनांची सोय असणे अशक्य होते. दगडधोंड्यांतून, जंगलातून पायपीट करीत त्याला चौदा मैल जावे लागले. या प्रवासाचा त्याला खूप त्रास झाला. पण तो इतका संवेदनशील होता की, या शारीरिक कष्टांची जाणीव होण्याऐवजी त्याला धुक्यातून जाणवलेले पन्हाळगडाचे नैसर्गिक सौंदर्य भाकले.
मामू हा परोपकारी होता. सेवाभावी होता. त्यामुळे तो कधीही, कोणालाही, कोणतीही मदत करायला तत्परतेने तयार असे. एखादयाला दुकान चालवण्यासाठी थोडा वेळ मदत करणे इथपासून ते उर्दू शिकवण्यासाठी शिक्षक होणे इथपर्यंतच्या सर्व प्रकारच्या भूमिका तो करत असे. कधी तो मौलवी असे. कधी व्यापारी, तर कधी उस्ताद. विविध प्रकारची कामे करता करता त्याने अनेक प्रकारची कौशल्ये आत्मसात केला. त्यामुळे त्याला लेखकांनी बहुरूप्याची उपमा दिली आहे
मामू सर्वांशी प्रेमाने, सेवाभावी वृत्तीने, नम्रपणाने, निगर्वीपणे वागत राहिला. साहजिकच समाजातल्या सर्व थरांतल्या अनेक लोकांशी त्याचे आपुलकीचे नाते निर्माण झाले. म्हणून मुलाच्या लग्नाच्या वेळी आमदार, खासदार, व्यापारी, शिक्षक-प्राध्यापक अशी विविध क्षेत्रांतली माणसे हजर होती. मात्र, या प्रसंगाने त्याच्या मनात गर्वाची भावना निर्माण झाली नाही. या क्षणीसुद्धा तो विनम्र होता. शाळेत कोणत्याही कामासाठी आलेल्या कोणत्याही व्यक्तीचे काम तो तत्परतेने करून देई. शाळेतल्या मुलांची तो आईच्या मायेने काळजी घेई. शाळेत होणारे कार्यक्रम, भाषणे, चर्चा तो मनापासून ऐकत असे. ऐकलेले मनात साठवून ठेवत असे. त्यामुळे अनेक विषयांचे ज्ञान त्याच्या डोक्यात साठवलेले असे. सर्वांविषयी त्याला ममत्व वाटत असल्याने तो सगळ्यांची आपलकीने चौकशी करी. सल्ले देई, आपले काम तो चोख व पद्धतशीरपणे करीत असे. एकंदरीत, किती चांगले असावे याचे आदर्श उदाहरण म्हणजे मामू होय.